Sunday, August 19, 2012

विश्लेषणात्मक


(आदरणीय राजीव उपद्ध्ये यांनी त्यांच्या ब्लोग वर जो लेख प्रसिद्ध केला त्यावरील संश्लेषण. ब्लॉगची लिंक दिली आहे खाली. आधी त्यांचा लेख वाचा म्हणजे खालील टिप्पणी समजण्यास मदत होईल. )

http://rajeev-upadhye.blogspot.in/2009/07/blog-post_30.html


सर, तुमचा अनुभव आणि कार्य खूप मोठे आहे. पण तरीही मला काही मुद्दे इथे नमूद करावेसे वाटतात. 
तुमचे लिखाण, माझ्या मताप्रमाणे मला, सार्वत्रिक वाटत नाही. मी तुम्हाला पुरुषप्रधान आहात असे कुठेही म्हणणार नाही. पण तुम्ही ज्याप्रमाणे "मुक्त स्त्री" ची जी व्याख्या केली आहे ती थोडीशी चुकीची वाटते. तुमचा आधार कदाचित Metropolitian Cities मधल्या स्त्रियांबद्दल असेल तर ठीकच आहे. भारत हा अजूनही खेड्यांचा देश आहे, इथे हजारो गावांमध्ये अजूनही लाईट पोचलेली नाहीये. त्यामुळे जेव्हा आपण 'स्त्री' किंवा 'पुरुष' यांच्याबद्दल सार्वत्रिकपणे बोलतो तेव्हा फक्त शहरातल्या लोकसंख्येचा  विचार करून बोलणे चुकीचे ठरेल. 'घटस्फोट' हा शब्द आज शहरी भागामध्ये रुळला जरी असला तरी मोठी शहरे सोडली, पुणे-मुंबई-चेन्नई-नागपूर-दिल्ली इ.इ., तर बाकी तर अजूनही ग्रामीण भागच आहे. आणि या भागामधील स्त्रियांचा विचार करणेही गरजेचे आहे असे मला वाटते. अजूनही स्त्री हि उपभोगाची एक 'वस्तू' म्हणून जेव्हा पुरुष तिच्याकडे पाहतो तेव्हा समाज हा २०० वर्षेच काय पण १००० वर्षे मागे असल्याचा पुरावा सापडतो.  

" आजची स्त्री मात्र पूर्ण वेगळी आहे. ती एक तर मुक्त आहे किंवा मुक्त होण्यासाठी धडपडत आहे, मग ती समाजाच्या कोणत्याही थरातील असो." 
तुमचे म्हणणे कदाचित एखाद्या दुसऱ्या देशाबाब्तीत जसे कि यु.के., अमेरिका,  १००% खरे होईल. पण भारत आणि भारतासारख्या, कांगो, आफ्रिकेतील बरेच मागास देश यांच्याबाबतीत आपले विधान चुकीचे ठरेल असे म्हणण्यास मला खेद वाटतो. आपल्या या वाक्याचे संदर्भ तुम्ही विस्तृत केले तर वस्तुस्थिती लक्षात येईल. आजची स्त्री पुरुषापासून, किंवा कोणत्याही जबाबदारीपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत नसून; तिला ज्याप्रमाणे 'चूल आणि मुल' या गोष्टीला जखडलेले आहे आणि स्त्रीने फक्त हेच करावे हि जी समाजाची मानसिकता आहे त्या मानासिक्तेपासून ती मुक्त होऊ पाहत आहे. जी मानसिकता स्त्रीला आखाड्पणे बोच्कारते आहे. आणि या समाज म्हणवणाऱ्या लोकांमध्ये जसे पुरुष आहेत तशा काही स्त्रिया खुद्द आहेत ज्या दुसऱ्या स्त्रीच्या मार्गात अडसर बनत आहेत. त्यामुळे मी कुठेच असे म्हणणार नाही कि 'पुरुष' सर्व गोष्टीला जबाबदार आहेत. जबाबदार आहे ती - मानसिकता, जी अजूनही १००% बदललेली नाहीये. तुम्ही म्हंटल्याप्रमाणे जेव्हा माणूस जंगलामध्ये राहत होता तेव्हा जंगली प्राण्यांपासून रक्षण करणे, शिकार करणे, शत्रूपासून रक्षण करणे हि कामे पुरुषाने स्वीकारली किंवा त्यांच्या जास्त शारीरिक क्षमतेमुळे त्यांना हि कामे निसर्गदत्त मिळाली आणि त्याच वेळी प्रजोत्पादन, मुलांचे संगोपन, घराची साफसफाई (त्यावेळी गुहेत माणूस राहायचा), आणि इतर कमी कष्टाची कामे स्त्रीने स्वीकारली किंवा तिला ती निसर्गदत मिळाली. पण आज पुरुष हा फक्त काही शारीर कष्टाचीच कामे करतो असे नाही, जिथे बुद्धीची आवश्यकता असते अशी बरीच कामे आहेत. आणि जस - जशी प्रगती होऊ लागली तशी स्त्रीला जेव्हा ती करायची इच्चा निर्माण झाली  तेव्हा या गोष्टी कुठेतरी नाकारल्या गेल्या त्या जंगलात राहण्याच्या मानासिक्तेवारच ना. माणूस खूप पुढे आला, पण स्त्रीबद्दलचे विचार आणि पुरुषाबद्दलचे विचार हे कदाचित आपल्या जनुकामध्ये खोलपर्यंत रुजले आहेत. आपण आज घरात राहतो, बंगल्यात राहतो, खेड्यांचा विचार केला तर वाड्यामध्ये किंवा झोपाद्यामध्ये राहतो. माणसाने शिक्षण पद्धती निर्माण केली त्याचे मूळ म्हणजे माणसाने स्वताला आणि समाजाला सुसंस्कृत, आरोग्यपूर्ण, भावी पिढीला जगण्यास सुसज्ज आणि स्वताला समृद्ध बनवावे यासाठी. आणि स्त्री सुद्धा माणूसच आहे, समाजाचा भाग आहे. जेव्हा तिला हे नाकारले जाते तेव्हा ती कुठेतरी या नाकारण्याच्या मानसिकतेपासून मुक्त होऊ पाहते, मुक्त होण्यास बंड करते. पण तिचे हे बंड फक्त एका पुरुषाशी नसून, समाजाशी आहे. 
आज शहरांमध्ये तुम्ही म्हंटल्याप्रमाणे परिस्थिती आहे. स्त्री हि तिला मिळालेल्या कायद्यांचा दुरुपयोग करत आहे, घटस्फोटासारखा निर्णय चुटकीसरशी घेते, तिच्या बिदागीसाठी ती कोर्टामध्ये केस फायली करते. जोब करणारी स्त्री असेल तर ती तिच्या स्त्रीत्वाच्या जोरावर आणि सहानुभूतीवर कदाचित यशाच्या पायऱ्या चढत असते, किती वेळा यामुळे खर्या खुर्या कष्टाळू पुरुषाच्या मार्गामध्ये अशीच एखादी स्त्री येत असेल, सुखवस्तू घरातून जेव्हा लग्न होवून स्त्री आपल्या सासरी जाते आणि जेव्हा तिच्या मनाप्रमाणे काही झाले नाही तर ती त्याला 'छळ झाला' असे म्हणून माहेरी निघून जाते. 
बऱ्याच सुना किंवा सासवा आपली जबाबदारी झटकून वागत असतात. आणि कदाचित एका सुनेच्या विचारसरणीला दुसरीच सासुच कारण असेल. पण हे सर्व जास्तीत जास्त शहरांमधली बाजू दर्शवते. ग्रामीण भागात आत्ता कुठे मुली दहावीपर्यंत शिक्षण घेवू लागल्या आहेत. त्या आत्ता कुठे खऱ्या स्वातंत्र्याला समजू लागल्या आहेत. त्यांच्याबद्दल हे विधान चुकीचे ठरते. 
केवळ शहर्यातल्या लोकसंखेच्या आधारावर आपण पूर्ण प्रदेशाचे सामिक्षीकरण करू शकत नाही. 
आणि काही गोष्टीला केवळ स्त्री जबाबदार आहे असे म्हणता येणार नाही, आज जी छोटी कुटुंबे असतात, व्यापारीकरण, मॉल संस्कृती, आई-वडिलांनी आपल्या मुलांना सहज उपलब्ध करून दिलेल्या गोष्टी यामुळे पुढे जावून अशा वातावरणात वाढलेली मुलगी सासरी जावून तशीच वागू शकते. याला केवळ तिचे स्त्रीत्व जबाबदार नसते. 
आणि राहिली गोष्ट विवाह बाह्य संबंधांची, तर तुमचे विधान मी पूर्णपणे नाही पण अर्धे चुकीचे आहे असे म्हणेल- माझ्या या म्हणण्याला माझ्याकडे आधार आहेत आणि हे विधान मी Generalisation पद्धतीने करत आहे.

बाकी तुम्ही खऱ्या सप्तपदीचे महत्व, त्याचा इतिहास, किंवा त्याचे धार्मिक महत्व आधी काय होते आणि आत्ता काय असायला हवे, किंवा जी सात वचन आहेत त्यामागचे विवेचन,  ते आज का करावे किंवा करू नये याची माहिती लेखामध्ये दिली असती तर लेख अजून उपयुक्त झाला असता. आणि ज्यावेळी तुम्ही पुरुषाची बाजू मांडलीत त्यावेळी स्त्रीसाठी याचे महत्व, समाजामध्ये या रिती-रिवाजांचे स्थान  हे सुद्धा मांडायला हवे होते. म्हणजे हा लेख बराच त्रयस्थ पद्धतीचा वाटला असता.

असो. सर तुम्ही खूप अनुभवी आहात, त्यामानाने मी खूपच लहान आहे. तुमच्या लेखात काय असायला हवे हे मी ठरवू शकत नाही. पण जेव्हा लेखक काही लिहितो तेव्हा त्या विषयाला अनुसरून वाचकाच्याही काही अपेक्षा असतात. कदाचित या अपेक्षेतूनच मी हा लेख लिहिला. पण शेवटी त्यावरून आपण आपले विचार बदलू शकत नाहीत आणि लेखनही. पण वाचकांच्या विचारांचे स्वागत नक्कीच करू शकतो. आणि आपल्या जेव्हा मनापासून पटेल तेव्हा आपण अंगिकारू शकतो.  आणि जर आपल्या लेखनाचा काही चुकीचा अर्थ कोणत्या वाचकाने घेतला असेल तर त्यातील मुल मुद्दा आपण वाचकाला समजावून सांगू शकतो. मी माझे विचार व्यक्त करताना कुठे चुकून तुमच्या भावनांना दुखावले असेल तर क्षमस्व. मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे.  
धन्यवाद.     

(माझ्या या लेखात मी थोड स्त्री आणि पुरुष या दोन जातींविषयी लिहायचा प्रयत्न केला होता. ते अवश्य वाचावे.
'याला जीवन ऐसे नाव'.)

2 comments: