Thursday, August 23, 2012

असेच काहीबाही, मनातले गोंधळ.


डोळे भिजून गेले होते ... पाण्याने उशी सुद्धा ओली ओली झाली होती. ती उठली आणि लिहायला बसली.. तेही काही सुचेना ...
खूप काही आठवत राहिले तिला, एकदम भार्काताल्यासारखे ती आठवणींमध्ये हरवून गेली - चांगल्या वाईट सर्वच.... 

रडताना तिला संदीप आणि सलील ची कविताही आठवत होती - 'गुलाबाची फुले दोन रोज रात्री डोळ्यांवर मुसु मुसु पाणी सांग भरतील काय...'
पण मधेच विचार करे कि काय फरक पडतोय आपण रडतोय याचा.. पण परत स्वताशीच म्हणे, निदान मनाला मोकळ तरी वाटत...

अगदी लहानपणीच आठवलं तिला - 
आई फ्रोक ची चेन बिघडली याचं दोषी तिलाच ठरवत होती. आणि ती बिचारी काहीही न बोलता गुपचूप डोळ्यांमधून टिपं गाळत उभी होती. 

बाहेर खेळायला गेली आणि धडपडून आली. गुढगा फुटला होता, आधी कुठे लागल हे बघायचं सोडून शब्दांचा मार मिळाला. मलम तर ती आधीच बाहेरूनच लावून आली होती- कसल्या तरी झुडुपाच्या पाल्याचा रस.
परत खेळायला गेली आणि परत पडून आली. मग तेव्हा तर तिने सांगितलेच नाही कि परत पडले आणि लागलं म्हणून. नशीब त्याच गुढग्यावर लागल्यामुळे दुसरीकडे कुठे जखम झाली नाही कि आईला समजलेही नाही. 
शाळेमध्ये कोणीच मैत्रीण नव्हत तिला. दुसरीमध्ये असताना तिच्या वर्गातल्या दोन जुळ्या बहिणींनी तिला बेंचवर बसण्यावरून बोचकारले होते. तिला खूप वाईट वाटले होते तेव्हा. 

कधीतरी पुढे पाचवीमध्ये तिला एक मैत्रीण भेटली. तिच्याशिवाय तिचं पान हलत नसे. तिचा अभ्यास सुधारला, तिने चित्र काढायला सुरुवात केली, कविता करायला सुरुवात केली. वर्गामध्ये ती लीडरशिप करू लागली आणि याचा सर्वात जास्त आनंद तिच्या मैत्रिणीला होई. आज तिला त्या मैत्रीणीचीही खूप तीव्र आठवण होऊ लागली होती. पण ती आता तिच्याशी बोलूही शकत नव्हती. कारण ती इतकी मऊ आणि मायाळू होती कि देवालाही तशी मैत्रीण जवळ ठेवायला आवडले. देवाने बोलावले आणि ती मैत्रीण निघून गेली. आज जे शब्द तिच्याजवळ होते ते फक्त आणि फक्त त्या मैत्रिणीची देण होते. म्हणून जेव्हा केव्हा ती लिहायला बसे तिला त्या प्रिय मैत्रिणीची आठवण झाल्याशिवाय राहवत नसे.

त्यानंतर तसं जवळच कोणीच बनू शकलं नाही. अगदी तिचा नवराही नाही, कि तिची आई सुद्धा तिच्या इतकी जवळ जावू शकली नव्हती. 
ती गेल्यापासून तिला खूपच एकट एकट वाटायचं. पण कोणाला सांगणार. देव पण असा असतो ना.

ती काहीतरी लिहायला सुरु करत होती आणि तिच्या डोळ्यातून टप टप धारा वाहू लागत. ती पुन्हा थांबे, विचारांच्या मागे पळत सुटे. गेल्या कित्तेक दिवसात ती हेच तर करत होती. 
अशा पळण्याने ती अक्षरशः खरोखरीच दमून जाई. तिला रात्री दिवसभर कुठल्यातरी खाणीमध्ये काम करून आल्यावर येतो तसा थकवा जाणावे. पण झोप मात्र येत नसे. पण याचा परिणाम म्हणजे घरातूनही तिने बाहेर पडायचे बंद केले होते.

तिला खरच कोणीतरी जवळच हव होत. पण कोणीच मिळत नव्हत किंवा कोणाचीच तिला झेलण्याची इच्छा होत नव्हती. तिला या रोज रोज विचारांच्या मागे धावण्याचा वैताग आला होता आणि खूप त्रास होत होता. कसलेतरी विचार करत बसायची आणि शेवटी रडून रडून थकून झोपून जायची. असलं जगण्यापेक्षा तिला मरून जावसं वाटायचं. 
पण परत एका मित्राची वाक्ये तिला आठवायची. कि आयुष्यामध्ये नेहमी आशावादी राहील पाहिजे - Optimist  असलं पाहिजे. आज तो तिच्याशी खूप तोडून वागतो हेही तिला लगेच त्यासोबत आठवायचे. आणि मग सगळ सगळ फोल फोल वाटायचं. सर्व खोट वाटायचं. आज तिने अशा बऱ्याच जणांना गमावलं होत. काही नियतीने हिरावून नेलं होत, काही नशिबाने तिच्यापासून दूर गेलं होत. पण देवालासुद्धा समजल नाही कि तिला खरच एका खूप समजूतदार मित्राची किंवा मैत्रिणीची गरज आहे. जो तिच्यावर मनापासून प्रेम करेल तिच्या सर्व गोष्टीमध्ये मनाने सोबत करेल. असा कोणीतरी मनकवडा, किंवा मनकवडी. 

तिने शेवटी कसबस लिहायला सुरु केलं -
'आज डोक्यामध्ये नेहमीसारखाच विचारांचा गोंधळ माजला आहे. नेहमीप्रमाणे मी विचारांच्या मागे धावत आहे आणि धावता धावता खूप थकली सुद्धा आहे. आणि शेवटी एक प्रश्न उरतोच - "आपण कशासाठी जगत आहोत.आपल्याला नक्की काय करायचे आहे." हे असले प्रश्न आले कि परत विचारांची शृंखला सुरु होते. पण आता मला खरच या प्रश्नांची उत्तर हवी आहेत. माणूस जन्म का घेतो? आई-वडील बाळाला जन्माला का घालतात? माणूस शिक्षण का घेतो? तो त्याची आयुष्याची काही ध्येये का ठरवतो? ती पूर्ण झाली तर तो आनंदित आणि नाही पूर्ण झाली तर दुखी का होतो? नोकरी का करतो? मैत्री का करतो? लग्न का करतो? आणि परत सर्व इथेच सोडून मारून का जातो?'
 'आई-वडिलांना खरच त्यांच्या प्रेमाचा अंश प्रत्यक्ष स्वरुपात या पृथ्वी वर आणून त्या प्रेमाला आणि प्रेमाच्या अंशाला वाढताना पाहायचे असते कि त्यांना खरतर त्यांचा वंश वाढवायचा असतो. कि खरतर हे काहीच खर नसून हा एक भावनिक खेळ मांडला आहे. जसा एक Reality Show , ज्यामध्ये आपण सर्व काम करतो पण ती खोटीच असतात शेवटी. आईच आणि बाळाच निस्वार्थ प्रेम असत तर मग आई का नाही आपल्या बाळाला सर्व काही निस्वार्थ पणे पाहायला शिकवत ? का तिचे विचार ती त्याच्यामध्ये रुजवते? माणूस हा प्रगत होत गेला तशी त्याची बुद्धी वाढली. म्हणजे तो विचार करू लागला, किंवा जास्त विचार करू लागला. 'विचार' म्हणजे त्याच मनसुद्धा हळू हळू निर्माण झाल आणि त्याचीही वाढ झाली, प्रगती झाली. प्रगती झाली म्हणजे वेग-वेगळ्या भावना अस्तित्वात आल्या. म्हणजे प्रेम-राग-द्वेष-उत्साह-दुखी या साऱ्या भावना सर्व नंतरच्या आहेत. मुळात एकच गोष्ट निरंतर राहिली - survival of fittest . म्हणजे हा मूळ विचार प्रक्टिकल आहे. आणि आज लोक सर्व प्रगती करून, सर्व भावभावना इतक्या वाढवून परत आपल्या मूळ विचाराकडेच जात आहेत. सोयीनुसार सर्वांशी वागायचं, सोयीनुसार प्रत्तेकाने एकमेकांशी संपर्क ठेवायचा, सोयीनुसार सर्वांच्या वागण्याचे अर्थ काढायचे आणि सोयीनुसार दुसऱ्यांच्या आयुष्याचे निर्णय घेवून मोकळे व्हायचे. आणि या सर्वामध्ये जर कोणी अप्रगत किंवा आदिवासी भागातले असतील तर त्यांना मात्र कोणाला एखाद वाईट वाक्य बोलल्याचासुद्धा त्रास होतो. अशा अप्रगत लोकांची प्रगती खुंटते आणि असे लोक मागे पडतात. खर तर असे लोक त्यांच्या आजूबाजूच्या लोकांपेक्षा आजूबाजूच्या वस्तूंबद्दल जास्त जागरूक व्हायला हवेत. उदा. माझा जॉब कसा टिकेल, माझी कंपनी कशी पुढे जाईल, किंवा माझी इज्जत कशी वाढीस लागेल, मी अधिक पैसा कसा कमावेल. कारण हीच परिमाण आहेत सुखी जगण्याची, पुढे जाण्याची आणि प्रगती करण्याची. '

ती खरच चिडली होती तिच्या आजू-बाजूच्या सर्व लोकांवर - ज्यांनी ज्यांनी तिला मनाने खूप छळलं होत. ज्यांच्यासाठी तिने जीवाचं रान केल होत त्यांना आज तिची काडीची किंमत सोडाच पण त्यांच्या आयुष्यात ती होती याची आठवणसुद्धा राहिली नव्हती. असे बरेच मित्र मैत्रिणी होते. ती फिरून फिरून मित्र मैत्रिणींवर का यायची याच कारण म्हणजे ती तिच्या मित्र मैत्रिणीवरच तर जगत होती. होत तिला कोण जवळच त्यांच्याशिवाय. घरातलं आणि नातेवाइकामध्ये तर जवळच कोणीच नाही. मग राहिले मित्र-मैत्रिणीच. त्यात पण मैत्रिणीच जास्ती. कारण मित्र तर पुढे कोलेज मध्ये बनलेले. 

ती पुढे लिहायला सुरुवात करते - 
'पण सारे सगळे स्वार्थी आणि ढोंगी. ज्यांना मी माझ्या आयुष्यात इतकी महत्वाची स्थान दिली ती अशी माझ आयुष्य उजाड करून, मला एकटीला सोडून निघून गेली. जाताना त्यांना काहीच कस वाटल नाही याच मला आश्चर्य वाटतंय. का तेसुद्धा Survial of the fittest च्या तत्वामध्ये अडकले होते कोण जाणे. लोकांना माणस महत्वाची का वाटत नाहीत याच मला खूप आश्चर्य वाटत. अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे - लग्न. लोक लग्न का करतात हे सुद्धा एक मोठ कोडंच आहे. काही जन सर्व करतात म्हणून करतात, काहीना माहिती असत कि शरीराची गरज भागवायची असेल तर लग्नाशिवाय कुठला नैतिक मार्ग नाहीये,  कोणालातरी आपल्या आई वडिलांसाठी लग्न करायचं असतं, कोणाला उगाच हौस किंवा मज्जा म्हणून, कोणाला हुंड्यासाठी, कोणाला वंश पुढे चालवण्यासाठी, कोणी प्रेम करतो म्हणून, तर कोणी एक काम उरकून टाकायचं म्हणून लग्न करतात. पण अजून हे लग्नाचं कोड मला तरी उलगडलेलं नाहीये. लोक प्रेम करतात म्हणजे काय हेही मला ना उलगडलेलं अजून एक कोड आहे. किंवा आधी मला वाटायचं कि प्रेम म्हणजे एकमेकांची मनापासून वाटलेली काळजी. त्या काळजी पोटी आपण ज्यावर प्रेम करतो त्याला खुश ठेवण्याची धडपड. त्या खुशीसाठी काहीही करायची तयारी. आणि काहीही करताना त्याचा मोबदला मिळावा असे मनातही न येणे. प्रेम म्हणजे एका मैत्रिणीवरही असू शकते, भावावरही असते, आई वर असते, काकांवर असते, आजोबा-आजीवरही असू शकते, आयुष्याच्या जोडीदारावरही असते, आणि ते स्वतावारही असू शकते. पण जेव्हा मला यांपैकी बऱ्याच जणांनी माझी हि व्याख्या चुकीची ठरवली, यातली काही लोक मला प्रेम करायला जवळ लाभलीच नाहीत आणि काहींच्या जवळ मी जावू शकले नाही. तेव्हापासून मला फक्त शेवटच वाक्य पटत कि - प्रेम हे फक्त स्वतावरच असू शकत. आणि कोणावरच नाही. आई-वडीलसुद्धा आपल्या मुलांकडून अपेक्षा करतातच कि. आणि अपेक्षा भंग झाली कि त्यांना दुखही होते आणि ते दुख वेग-वेगळ्या मार्गाने व्यक्तही होते. आणि माझ्या आजूबाजूच्या या लोकांनीच मला माझी प्रेमाची व्याख्या बदलायला लावली. '

'हे असंच होत. आजकाल मी असेच विचार करत बसते. मधूनच काहीबाही आठवत रहात आणि बर्रोब्बर वेळेलाच मला आठवत. आणि मग असेच रागाचे ज्वालामुखी मनामध्ये आणि डोक्यामध्ये धुमसत राहतात. सर्व लोकांचा राग राग येत राहतो. आणि मग माझंही मन नकळतपणे ठरवू लागत, कि सर्वाना एकदा अद्दल घडली आणि घडवली पाहिजे. माझे दिवस सुरु झाले कि एकेकाची अश्शी जिरवेल ना मग कळेल या सर्वाना कि मी काय चीज आहे. आणि अगदीच नकळतपणे मीसुद्धा त्या नियमाला माझ आयुष्य जगण्याच परिमाण करू पाहते - Survival of the fittest .' 


P . S . - 'असंच विचारांच्या मागे धावून धावून मी थकून जाते. इतका वेळ निद्रादेवीची केलेली आराधना फळास येते. आणि हळू हळू झोप मला येण्यास सुरुवात होते. .........   

No comments:

Post a Comment