Showing posts with label Living happily. Show all posts
Showing posts with label Living happily. Show all posts

Saturday, July 23, 2011

..याला जीवन ऐसे नाव..



खूप पूर्वी अगदी हजार शतकांपूर्वी ची हि गोष्ट आहे. त्या काळी स्त्रिया आणि पुरुष हे प्रकार नव्हते. खर तर त्यावेळी पुरुष आणि स्त्री हे दोन वेगळे प्राणी अशी समजूत होती. त्या वेळी हि दोन प्राणी वेगवेगळे राहायचे, त्यांचे वर्ग सुद्धा वेगवेगळे असायचे. पण हळू हळू बुद्धी या नैसर्गिक देणगीमुळे त्यांना एकमेकांना  लक्षात येवू लागले कि काही कामे हा दुसरा प्राणी चांगली करतो. उदा. शिकार करणे पुरुष प्राण्याला चांगले जमते तर त्या शिकारीला खाण्यायोग्य बनवणे हे स्त्री या प्राण्याला चांगले जमते. मग या दोन प्राण्यांनी संगनमताने एकत्र राहायचा निर्णय घेतला - आत्म वृद्धीसाठी ! हळू हळू सृजनशीलता वाढू लागली तशी त्यांना नियमांची गरज भासू लागली. सुरुवातीला भाषा वगैरे काही नव्हती जे काही संभाषण व्हायचे ते फक्त वेगवेगळे आवाज खाणा खुणा किवा काही इशारे वापरूनच.  कधीतरी शिकार भरपूर मिळे कधी खूपच कमी मिळे, मग तेव्हा हे दोन प्राणी हिंसक बनू लागले. एकमेकांच्यात हाणामारी होऊ लागली,त्यांच्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी त्या दोन प्राण्यांनी काही नियम आखले. काही नियम दोन्ही प्राण्यांसाठी होते, आणि काही नियम वेग वेगळे बनवले गेले. स्त्री प्राणी आधी एकटा होता तेवा त्यांना शिकार करणे आणि ती खाण्यायोग्य करणे हि दोनही कामे करावी लागत. पण जेवा पासून त्यांनी या नवीन मनुष्य प्रण्यासोबत हात मिळवणी केली होती तेवापासून त्यांच्याकडे दिवसाचा खूप वेळ रिकामा पडत असे. मग या वेळात त्यांनी वस्त्र निर्मिती, निरनिराळे अलंकार बनवणे, रहायची जागा नीटनेटकी ठेवणे हि अवांतर कामे चालू ठेवली.  नैसार्किक प्रक्रिया म्हणून प्रजनन त्यांना समजू लागले. हळू हळू काही काळा नंतर होणारे मृत्यू समजू लागले. मग आपल्याला लोक हवीत हि भावना जागृत झाली. आणि मग प्रजननाची प्रक्रिया त्यांना खरी लक्षात आली कि यामुळे आपल्याला आपली लोक वाढवता येतात आणि हि शक्ती स्त्री प्राण्यात आहे हे लक्षात आले. पण पुरुष प्राण्याशिवाय हे होऊ शकत नाही हेसुद्धा स्त्री प्राण्याला समजले. पुढे कोणता स्त्री प्राणी कोणत्या पुरुष प्रण्यासोबत राहणार यावरून वादावादी होऊ लागली तेवा कुटुंब पद्धती निर्माण झाली. "लग्न " हि संस्कृती निर्माण केली. मग त्यांची त्यांची मुलं, त्यांची नातवंड, त्यांचे घर वेग वेगळे बनू लागले. सुरुवातीला स्वखुशीने स्वीकारलेली कामे आता स्त्री प्राण्याला जबरदस्तीने करावी लागू लागली. स्त्री प्राण्याला बाहेर पडायला आणि पुरुष प्राण्यासोबत शिकार करण्यास जायला तिचे मन प्रवृत्त करू लागले पण पुरुष प्राण्याला हि फक्त आपलीच सत्ता असे वाटू लागले. हळू हळू सोयीसाठी, सुरक्षिततेसाठी निर्माण केलेली बंधने जाचक आणि हिंसक बनू लागली. 

आज समाज का निर्माण झाला, याचे मूळ करणाच आपण विसरून चाललो आहोत. आपल्या पूर्वजांनी समाज हा प्रगतीसाठी, आत्मवृद्धीसाठी साठी बनवला होता आणि आज याच समाजामुळे कितीतरी मनुष्य प्राण्याला स्वताची प्रगती तर सोडाच पण साधे जगणेही मुश्कील झाले आहे.  स्त्रीला एक प्राणी म्हणून अस्तित्व द्यायचे सोडून तिची दया येवून तिला ३३% आरक्षण दान दिल्यासारखे दिले आहे. समाज सुरळीत पणे चालण्यासाठी हे दोनही प्राणी आवश्यक आहेत.  तेव्हा या दोनही प्राण्यांनी समान हक्काने, समान अधिकाराने समाजात वावरले पाहिजे. एक शोभेची वस्तू म्हणून स्त्री ला गणले जावू नये, किवा फक्त कवितेतून नाजूक वाटणाऱ्या ह्या स्त्री ला नाजूक समजुसुद्धा नये. खूप पूर्वी समाजच्या हितासाठी काही कामे स्त्री आणि पुरुषाने वाटून घेतली होती याचा अर्थ असा होत नाही कि स्त्री ने तीच कामे केली पाहिजेत. आज खूप कुटुंबामध्ये स्त्री ला समानतेची वागणूक दिली जात आहे, आणि सगळीकडे हळू हळू हे संस्कार रुजतील अशी नक्कीच आशा आहे पण त्यासाठी स्त्री ने दुसऱ्या स्त्री ला सन्मान दिला पाहिजे, आई ने आपल्या मुलीला, बहिणीने बहिणीला, आजीने नातीला आणि सुनेने सासूला आदर सत्कार सन्मान दिला पाहिजे. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला आदर दिला तरच पुरुषांकडून आदर मिळेल. 
एका स्त्री ला "पुरुष " हि जी उंची ठरवून दिलेली आहे ती सर्वांनी मोडली पाहिजे. का एका स्त्री ने पुरुषाप्रमाणे काम केले म्हणजे तिचे कौतुक होते ? का कंडक्टर म्हणजे पुरुषच ? आणि मग कोणी स्त्री कंडक्टर झाली कि सर्व तिचे कौतुक करताना म्हणतात "बघा, कशी पुरुषासारखी कंडक्टर चे काम करते आहे. कमाल आहे तिची." म्हणजे एका स्त्री ने पुरुषाची कामे केली म्हणजे ती खूप भारी का?  असं नकोय. स्त्री ने पुरुषाची बरोबरी करण्याचा अट्टहास सोडून दिला पाहिजे. स्त्री हि स्त्री आहे आणि पुरुष हा पुरुष. ते कधीच एकमेकांची जागा घेवू शकत नाहीत. आणि एकमेकांची बरोबरीसुद्धा नाही करू शकत. जरी एकच असतील तरी या दोन्ही प्राण्यांच्या जाती वेग वेगळ्या आहेत. वाघाची आणि सिंहाची बरोबरी होऊ शकत नाही तशीच स्त्री ची आणि पुरुषाची सुद्धा नाही. काही कामे स्त्री शिवाय दुसर कोणीच चांगल करू शकत अन्ही आणि काही कामे पुरुषाशिवाय दुसर कोणीच चांगल करू शकत नाहीत. त्यामुळे एकमेकांची बरोबरी, एकमेकांचा अपमान करण्या पेक्षा आपण सोबत मिळून प्रगतीकडे वाटचाल करूयात. जशी आजवर प्रगती केलीत तशीच पण थोडी वेगळी. स्त्री हक्काचे कायदे करण्यात आज आपल्या समाजाचा वेळ जात आहे तोच वेळ जर आपण गरीब, अनाथ, अशिक्षित, अपंग, निसर्ग, रोगी या सर्वाना आनंद देण्यात, यांची काळजी घेण्यात आणि यांच्यासोबत  घालवला तर आपण नक्कीच समाधानाने जगू आणि आपल्या पुढच्या पिढीलाही कदाचित हि पृथ्वी सुरक्षित देवू असा विश्वास वाटतो.

(हा विषय इतका विस्तृत आहे कि उत्तरार्ध अजून बाकी आहे.)